सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख

सिंधुदुर्गच्या नावातच याचा इतिहास दडलेला आहे! “सिंधुदुर्ग” म्हणजे समुद्रातील किल्ला, आणि या जिल्ह्याला हे नाव लाभले आहे ते याच प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे! मालवणच्या किनाऱ्यावर असलेल्या खडकाळ बेटावर हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

हा जिल्हा निसर्गसौंदर्य आणि संस्कृतीने नटलेला आहे. सुंदर समुद्रकिनारे, हिरवाईने भरलेले बॅकवॉटर्स, मनमोहक धबधबे आणि श्रद्धास्थाने यांचा मिलाफ येथे पाहायला मिळतो. पश्चिमेला 122 किलोमीटर लांब अरबी समुद्राचा विस्तीर्ण किनारा आणि पूर्वेला सह्याद्री पर्वतरांगांची कुशीत वसलेला हा जिल्हा जैवविविधतेने समृद्ध आहे.

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मॅंग्रोव्ह्स, प्रवाळ, दलदलीचे किनारे आणि खडकाळ बेटांचे अनोखे समुद्री वातावरण आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने भारतातील महत्त्वाच्या समुद्री इकोसिस्टिम्सपैकी एक आहे. या निळ्याशार पाण्यात व्हेल आणि व्हेल शार्कसारखे महासागरातील महाकाय जीव स्थलांतर करताना पाहायला मिळतात. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच पद्मगड किल्लाही या जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.

निसर्ग आणि इतिहास यांबरोबरच सिंधुदुर्ग त्याच्या खास उष्णकटिबंधीय फळांसाठीही प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबे, काजू, जांभूळ आणि कोकम येथे विपुल प्रमाणात आढळतात. सावंतवाडी शहर खासकरून चितार समाजाच्या कुशल कारागिरांनी बनवलेल्या लाकडी खेळण्यांसाठी ओळखले जाते. याशिवाय, सिंधुदुर्ग हे स्कूबा डायव्हिंगसाठीही प्रसिद्ध होत आहे. येथे समुद्रतळाशी एक वेगळ्याच जगाचा अद्भुत अनुभव घेता येतो.

इतिहास, निसर्ग आणि साहस यांच्या अनोख्या संगमाने नटलेला सिंधुदुर्ग प्रत्येक प्रवासप्रेमीच्या यादीत असायलाच हवा!

सिंधुदुर्गचा इतिहास

सिंधुदुर्गचा इतिहास हा पश्चिम किनाऱ्यावर झालेल्या सत्तासंघर्षांशी जवळून जोडलेला आहे. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी या भागावर वर्चस्व मिळवले आणि स्थानिक शासकांसमोर मोठे आव्हान उभे केले. मात्र, १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रदेश सुलतानाच्या ताब्यातून परत मिळवून मराठा साम्राज्यात समाविष्ट केला. त्यानंतर १८१७ पर्यंत मराठ्यांचे या प्रदेशावर नियंत्रण होते. मात्र, त्या वर्षी पेशव्यांचा पराभव करून इंग्रजांनी संपूर्ण कोकण प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५६ मध्ये सिंधुदुर्ग बॉम्बे राज्याचा भाग बनला आणि १९६० मध्ये महाराष्ट्रात समाविष्ट झाला. या जिल्ह्याचे नाव ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवले गेले, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात १६६४ ते १६६७ या कालावधीत बांधला. हा किल्ला इतक्या रणनीतीने उभारला गेला होता की अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या जहाजांना तो सहज दिसू नये.

प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी, १ मे १९८१ रोजी सिंधुदुर्गला रत्नागिरी जिल्ह्यापासून वेगळे करून स्वतंत्र जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आले. या ऐतिहासिक वारशाने आणि रणनीतिक महत्त्वाने सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या संपन्न इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय बनला आहे.

सिंधुदुर्गमधील पर्यटन स्थळे

  • धार्मिक स्थळे
    १. श्री वाघेश्वर मंदिर
    श्री वाघेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून, त्याची एक रोमांचक कथा आहे. स्थानिक किवदंतीनुसार, एका मच्छिमाराला समुद्राजवळ शिवलिंग सापडले आणि काही काळातच त्याच्या भोवतीची जमीन आपोआप उकरून वरती आली. या दिव्य घटनेचा सन्मान करण्यासाठी हे मंदिर उभारले गेले. स्थानिकांचा असा विश्वास आहे की, या परिसरात कधी काळी वाघ फिरत, पण त्यांनी कधीही कोणाला हानी पोहोचवली नाही.
    २. जय गणेश मंदिर
    “कालनिर्णय” दिनदर्शिकेचे निर्माते असलेले ज्योतिषी जयंत राव साळगावकर यांनी बांधलेले जय गणेश मंदिर हे एक अत्यंत आकर्षक मंदिर आहे. पांढऱ्या आणि सोनरी रंगांमध्ये सजवलेल्या या मंदीरात भगवान गणेशाची मूळ प्रतिमा, सिद्धी-रिद्धी यांच्यासोबत ठेवलेली आहे. गणेशोत्सवाच्या वेळी, हे मंदिर भक्तांच्या एकतेचे केंद्र बनते आणि खूप पर्यटक येथे भेट देतात.
    ३. सातेरी देवी जल मंदिर
    हे मंदिर देवी सातेरीला समर्पित आहे. या मंदिराच्या आसपास एक शांत जलाशय आहे, ज्यामुळे इथल्या परिसराचे सौंदर्य खुलते. शांत वातावरण आणि निसर्गाची सुंदरता यामुळे हे मंदिर भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी एक शांत आणि सुखद ठिकाण आहे.
    श्री भद्रकाली मंदिर
    सुमारे ४०० वर्षांपूर्वी उभारलेले हे मंदिर देवी भद्रकालीला समर्पित आहे. अरबी समुद्राच्या काठावर, हिरवळीने वेढलेल्या या मंदिराचे साधे पण नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आध्यात्मिक शांतता प्रदान करते.
  • किल्ले
    १. सिंधुदुर्ग किल्ला
    सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा सैन्य सामर्थ्याचा एक महत्त्वपूर्ण ठसा अरबी समुद्रावर उमटवतो. ४८ एकर जागेवर पसरलेल्या या भव्य किल्ल्याच्या उंच भिंती अनाहूत लाटांना रोखण्याचे प्रचंड सामर्थ्य दाखवतात. त्याच्या प्रवेशद्वाराची रचना चतुराईने लपवलेली असून ती किल्ल्याच्या बांधकामाच्या रणनीतिक दूरदृष्टीचा पुरावा आहे. केवळ ऐतिहासिक महत्त्वच नाही, तर समुद्राच्या विशाल विस्तारामध्ये वसलेल्या या किल्ल्याचे दृश्य देखील मंत्रमुग्ध करणारे आहे, ज्यामुळे हा किल्ला एक प्रमुख आकर्षण बनतो.
    २. सर्जेकोट किल्ला
    सर्जेकोट किल्ला हा एक कमी ओळखला जाणारा, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. हा मराठा साम्राज्याच्या सैनिकी कौशल्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही कार्यकाळात बांधलेला हा किल्ला, कोकण किनाऱ्याच्या संरक्षणासाठी बनवलेल्या महत्त्वाच्या संरक्षण यंत्रणांचा भाग होता. विशेषत: पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या आक्रमणांपासून कोकण किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला.
  • समुद्रकिनारे
    १. आरसे महल बीच
    सिंधुदुर्गमधील एक लपलेला रत्न, आरसे महल बीच हे चिवला बीचचे छोटेखानी पण सुंदर व्हर्जन आहे. शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले हा किनारा त्याच्या नौदलातल्या सहभागासाठी देखील ओळखला जातो. इथे पेट्रोल स्टेशन आणि नौदलाचा एक विभाग कार्यरत आहे.
    २. वेंगुर्ला मालवण बीच
    वेंगुर्ला मालवण बीच हा पर्यटकांच्या गर्दीपासून शांतता आणि निवांतपणाचा अनुभव देणारे ठिकाण आहे. पाम, नारळ, काजू आणि आंब्याच्या झाडांनी सजलेले हिरवे डोंगर या समुद्रकिनाऱ्याला एक अद्वितीय सौंदर्य प्रदान करतात. अरबी समुद्रासोबत या किनाऱ्याची रेषा नेहमीच आकर्षक वाटते.
    २. तळाशील तोंडवली बीच
    तळाशील तोंडवली बीच हे सोनेरी वाळूने भरलेला एक विशाल किनारा आहे, जो झुलणाऱ्या नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. हलक्या लाटा त्याच्या शांत सौंदर्यात भर घालतात. अती गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा तळाशील तोंडवली विश्रांतीसाठी आणि शांततेसाठी निसर्गप्रेमींना खुणावते.
  • निसर्गरम्य स्थळे
    १. अंबोली घाट
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण महाराष्ट्रातील अंबोली घाट हे एक आकर्षक हिल स्टेशन आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या या स्थळाला त्याच्या अद्भुत धबधब्यांसाठी ओळखले जाते. अंबोलीला महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च पावसाचे ठिकाण आहे, त्यामुळे जुलै ते ऑगस्ट या पावसाळी सीझनमध्ये येथील सफर अविस्मरणीय ठरते.
    २. सावंतवाडीचा राजवाडा
    सावंतवाडीतील राजवाडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ आहे. १७५५ ते १८३० या काळात इथे राज्य करणारे खेम सावंत भोसले यांनी बांधलेला हा राजवाडा सावंतवाडी शहराच्या मध्यात उभा आहे आणि एक प्रमुख ऐतिहासिक वस्तू म्हणून ओळखला जातो.
    ३. मालवण मरीन संक्चुरी
    १९८७ मध्ये स्थापित केलेली मालवण मरीन संक्चुरी ही महाराष्ट्राचे एकमेव समुद्री अभयारण्य आहे! हे साधारण २७ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. या संरक्षित क्षेत्रात प्रवाळ भित्ती, मोती मण्यांचे ऑयस्टर, समुद्री शैवाल, मच्छल, शंख आणि अनेक विविध प्रजातींचे मासे दिसतात. या सागरी अभयारण्यात भेट देणाऱ्यांना एक अद्वितीय दृष्य अनुभवता येते.
  • त्सुनामी बेट
    त्सुनामी बेट साहस प्रेमींसाठी एक स्वर्ग आहे, जिथे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो जसे की जेट स्कीइंग, बनाना बोट राइड्स, कायकिंग आणि बम्पर बोटिंग! या बेटाच्या वाळूत चुंबकीय गुणधर्म असण्याचा विश्वास आहे, ज्यामुळे त्वचेवर लावल्यास सांध्यांच्या वेदनांमध्ये आराम मिळतो, त्यामुळे या उत्साही स्थळाला भेट देणे हा एक अनोखा अनुभव आहे.
  • अन्य आकर्षणे
    स्कूबा डायव्हिंग आणि स्नोर्कलिंग:सिंधुदुर्ग लवकरच भारतातील सर्वात प्रमुख वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांपैकी एक बनत आहे. या जिल्ह्याच्या क्रिस्टल-क्लिअर पाण्यामुळे स्कूबा डायव्हिंग आणि स्नोर्कलिंग यासाठी आदर्श वातावरण आहे. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी एक अनिवार्य डेस्टिनेशन आहे. स्कूबा डायव्हिंग ही एक रोमांचक अनुभव देणारी ऍक्टिव्हिटी आहे, इथे डायव्हर्स समुद्राच्या रंगीबेरंगी जीवनाचा शोध घेतात. पाण्याच्या खाली, तुम्हाला विविध रंगांचे मासे, प्रवाळ भित्ती आणि इतर आकर्षक समुद्री जीव दिसतात. विशेषतः सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजुबाजूचे पाणी या क्षेत्रातील काही सुंदर आणि चांगल्या प्रकारे जतन केलेल्या प्रवाळ भित्तीचे घर आहे, ज्यामुळे ते डायव्हिंगसाठी एक प्रमुख ठिकाण आहे. वॉटर स्पोर्ट्समध्ये स्नोर्कलिंग हा अजून एक आकर्षक पर्याय आहे. स्नोर्कलिंगमधून पर्यटक शॅलो रीफ्सवर तरंगत, समुद्री समृद्ध जीवनाचा जवळून अनुभव घेऊ शकतात, आणि त्यासाठी डीप पाण्यात जाऊन डायव्हिंग करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एक अनुभवी डायव्हर असाल किंवा प्रथमच स्नोर्कलिंग करणारे असाल, सिंधुदुर्गच्या पाण्याच्या खोलातील जग तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव देतं.

स्वच्छ पाणी, समृद्ध जैवविविधता आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी ऐतिहासिक स्थळे यांच्या संयोजनामुळे सिंधुदुर्ग एक खऱ्या अर्थाने अनोखे डेस्टिनेशन ठरते, जेथे तुम्ही प्रवासाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

हंगाममहिनेहवामान परिस्थितीमुख्य आकर्षण
हिवाळा (सर्वोत्तम काळ)ऑक्टोबर – मार्चआल्हाददायक आणि थंडसमुद्रकिनाऱ्यांवर भेट देणे, वॉटर स्पोर्टस आणि पर्यटनासाठी आदर्श; उन्हाळ्याच्या तुलनेत कमी गर्दी.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला का भेट द्यावी?

सिंधुदुर्ग हे निसर्गसौंदर्य, समृद्ध इतिहास आणि रोमांचक साहसांचा उत्तम मिश्रण असलेले ठिकाण आहे, आणि ते तुमच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये असायलाच हवे! येथील जैविक इकोसिस्टिम अत्यंत खास आहे, ज्यामध्ये मॅंग्रोव्ह्स, प्रवाळ खडक आणि समृद्ध सागरी जीवन यांचा समावेश होतो. त्यामुळे सिंधुदुर्ग भारतातील एक प्रमुख स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी आदर्श डेस्टिनेशन मानले जाते.

सिंधुदुर्गमधील उष्णकटिबंधीय फळे, विशेषतः हापूस आंबे ही जगभर प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे हे खाद्यप्रेमींसाठी देखील एक विशेष आकर्षण आहे. याचसोबत, सिंधुदुर्गचे शांत आणि साधे वातावरण, इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत कमी गर्दी आणि सौम्य निसर्ग यामुळे ते एक आदर्श ठिकाण बनते. इथे तुम्ही आराम करू शकता आणि पुन्हा ताजेतवाने होऊ शकता.

संपूर्णपणे, तुम्हाला निसर्गाचा, इतिहासाचा आणि साहसाचा उत्तम अनुभव घेता येईल असे सिंधुदुर्ग हे एक उत्कृष्ट प्रवास स्थळ आहे!

प्रवासासाठी आवश्यक गोष्टी

प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.

हवामान

26 - 30°C

आदर्श कालावधी

१ - २ दिवस

सर्वोत्तम वेळ

ऑक्टोबर ते मार्च

प्रमुख आकर्षणे

आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

रॉक गार्डन

रॉक गार्डन (एक लोकप्रिय सनसेट पॉईंट): चिवला बीचलगत वसलेले हे उद्यान खडकाळ किनाऱ्यावर उभारण्यात आले आहे. शतकानुशतके सतत आदळणाऱ्या लाटांमुळे या किनाऱ्याला विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. सुंदररीत्या विकसित केलेल्या या परिसरात पर्यटकांना समुद्राची नयनरम्य दृश्ये अनुभवता येतात आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो.

मालवण सागरी अभयारण्य

मालवण सागरी अभयारण्य हे प्रवाळांच्या (कोरल) सानिध्यात स्कूबा डायव्हिंगसाठी आदर्श ठिकाण आहे. २९.१२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या आणि १९८७ मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्याची ओळख येथील समृद्ध सागरी जैवविविधतेसाठी आहे; यामध्ये प्रवाळ, मृदुकाय प्राणी (मोलस्क) आणि मोती देणारे शिंपले (पर्ल ऑयस्टर्स) यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

Sindhudurg सिंधुदुर्ग किल्ला: मराठा इतिहासाचा अनुभव घ्या. चहूबाजूंनी पाणी आणि धोकादायक खडकांनी वेढलेला हा भव्य किल्ला महान मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६४-६७ या काळात बांधला होता; या भौगोलिक रचनेमुळे शत्रूला कोणाच्याही नजरेस न पडता या किल्ल्याच्या जवळ पोहोचणे जवळपास अशक्य होते.Fort Explore Maratha History An imposing fort surrounded by water and treacherous rocks on all sides, making it virtually impossible for enemies to approach without being seen, Sindhudurg was built in 1664-67 AD by the great Maratha king Chhatrapati Shivaji Maharaj.

तारकर्ली बीच

मालवण शहराच्या उपनगरात वसलेला तारकर्ली बीच हा शुभ्र पांढऱ्या वाळूचा आणि सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या किनाऱ्याचा एक विस्तीर्ण पट्टा आहे; हा किनारा कारली नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर स्थित आहे.

सुनामी बेट

वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी 'सुनामी आयलंड' हे एक उत्तम ठिकाण आहे. मालवणच्या किनाऱ्यालगत वसलेले हे बेट येथील वालुकामय किनारे (जे भरतीच्या वेळी अंशतः पाण्याखाली जातात) आणि रोमांचक वॉटर स्पोर्ट्समुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

रामेश्वर मंदिर

रामेश्वर मंदिर - भगवान शिवांचे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र: मालवणमधील एक प्रमुख धार्मिक स्थळ असलेले रामेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, यात पारंपरिक कोकणी वास्तुकलेची वैशिष्ट्ये दिसून येतात.

आचरा बीच

मालवणमधील 'अचरा बीच' हे एक अजून फारसे ज्ञात नसलेले सुंदर ठिकाण आहे. मालवणच्या उपनगरातील अचरा गावात वसलेला हा समुद्रकिनारा येथील स्वच्छ व सुंदर वाळूचा पट्टा, मनमोहक निळाशार समुद्र आणि खारफुटीच्या (मँग्रोव्ह) जंगलासाठी ओळखला जातो.

श्री सातेरी मंदिर

श्री सातेरी मंदिर (स्थानिक देवतेची उपासना): मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिलवास या गावात हे भव्य आणि प्राचीन मंदिर स्थित आहे. हे मंदिर बिलवास येथील 'श्री सातेरी' या स्थानिक देवतेला समर्पित आहे.

निवती बीच

हे ठिकाण निवती किल्ल्याच्या अगदी जवळ आहे. निवती किल्ला फारशा चांगल्या स्थितीत नसला, तरी तिथल्या माथ्यावरून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे. जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. सिंधुदुर्गातील इतर समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे फारशी गर्दी नसते, त्यामुळे शांतता पसंत करणाऱ्यांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. छायाचित्रणाची आवड असलेल्यांना येथील सौंदर्य टिपताना विशेष आनंद मिळेल.

आंबोली धबधबा

अंबोली धबधबा हे महाराष्ट्रातील (भारत) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या थंड हवेच्या ठिकाणचे (हिल स्टेशन) एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा या भागातील प्रमुख धबधब्यांपैकी एक असून, तो घनदाट हिरवीगार जंगले आणि खडकाळ कड्यांच्या मधोमध असलेल्या निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात या धबधब्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेवर असतो आणि त्याचे पाणी वेगाने खाली असलेल्या जलाशयात कोसळते. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि परिसरातील शांत वातावरण यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अनेकदा धबधब्यापर्यंत ट्रेकिंग करत जातात.

देवबाग बीच

देवबाग बीच हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरालगत वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. शांत वातावरण, स्वच्छ पाणी आणि सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेला हा समुद्रकिनारा अतिशय सुंदर दृश्ये प्रदान करतो आणि विश्रांती तसेच वॉटर स्पोर्ट्ससाठी (जलक्रीडा) एक उत्तम ठिकाण आहे. तसेच, हे ठिकाण जवळच असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे आणि किनारपट्टीवरील इतर आकर्षणस्थळांकडे जाण्याचे प्रवेशद्वारही ठरते.

भोगवे बीच

भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले भोगवे बीच हे एक शांत आणि फारसे परिचित नसलेले समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन स्थळ आहे. येथील स्वच्छ, सोनेरी वाळू आणि नितळ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. दाट हिरवाई आणि मासेमारी करणाऱ्या गावांनी वेढलेले हे ठिकाण विश्रांती घेण्यासाठी आणि किनाऱ्यावर निवांत फेरफटका मारण्यासाठी अतिशय योग्य आहे.

देवगड बीच

देवगड बीच हा महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून, तो विजयदुर्ग बीचच्या दक्षिणेस ३० किमी आणि कुणकेश्वर बीचच्या उत्तरेस ७ किमी अंतरावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शहरात असलेला हा बीच अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. हे पर्यटकांचे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून ते देवगड बस स्थानकापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे.

कसे पोहोचाल

विमानाने

सर्वात जवळची विमानतळे सिंधुदुर्ग, बेळगाव (कर्नाटक) आणि दाबोळी (गोवा) येथे आहेत.

रेल्वेने

कोकण रेल्वेचा प्रवास, जी कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबते.

रस्त्याने

सिंधुदुर्गला NH-17 या महामार्गावरून रस्तेमार्गे पोहोचता येते; हा महामार्ग कणकवली आणि कुडाळ यांसारख्या प्रमुख शहरांमधून जातो.
Scroll to Top