हिंगोली जिल्ह्याची ओळख
महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला हिंगोली जिल्हा अनेक प्रवाशांच्या नजरेतून सुटतो. पण हा कमी माहित असलेला भाग इतिहास, निसर्गसौंदर्य आणि विविध संस्कृतींचा खजिना आहे. अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित असूनही हा तुम्हाला गर्दीपासून दूर खऱ्या महाराष्ट्राचा अनुभव देईल.
हिंगोलीत प्रवेश करताच तुम्हाला इथलं शांत वातावरण, पारंपरिक जीवनशैली आणि प्रेमळ माणसं भुरळ घालतील. जर तुम्ही इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी किंवा खाद्यप्रेमी असाल तर हिंगोलीत तुम्हाला उत्तम अनुभव मिळेल. इथली संस्कृती आणि निसर्गाची अनोखी सांगड तुमच्या मनात कायमचे घर करून राहील.
हिंगोलीचा समृद्ध इतिहास
हिंगोली जिल्ह्याचा इतिहास शतकानुशतके जुना असून तो विविध राजवटी, तह आणि युद्धांनी घडवला आहे. ब्रिटीश सत्तेच्या काळात १८५७ मध्ये हिंगोली दक्षिण बेरार प्रांताचे मुख्यालय बनले. १८५७ च्या स्वातंत्र्य उठावानंतर हा भाग पुन्हा निजामांच्या ताब्यात गेला.
इतिहास पाहता हिंगोली हे निजामाच्या सत्तेखाली एक महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. येथे दोन महत्त्वाची युद्धे झाली. १८३० मध्ये टीपू सुलतान आणि मराठ्यांमध्ये तसेच १८५७ मध्ये नागपूरकर आणि भोसले सैन्यातील लढाई! या सैनिकी इतिहासाचे प्रतिबिंब पलटण, तोफखाना आणि पेन्शनपुरा यांसारख्या भागांमध्ये आजही दिसून येते.
पुढे हा भाग १९५६ मध्ये बॉम्बे राज्याचा तर १९६० मध्ये महाराष्ट्राचा भाग बनला. १९९९ मध्ये हिंगोली स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.
हिंगोलीमधील पर्यटन स्थळे
हिंगोली प्रामुख्याने धार्मिक स्थळांसाठी ओळखला जातो. हिंगोलीत तुम्ही मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर, औंढा नागनाथ, तुळजादेवी संस्थान आणि संत नामदेव संस्थान ही नक्कीच भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. या सोबतच पर्यटकांसाठी इतरही आकर्षक स्थळे आहेत.
- धार्मिक स्थळे
१. औंढा नागनाथ मंदिर: शिवमंदिरांमध्ये औंढा नागनाथ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. इतर मंदिरे मानवनिर्मित मूर्तींना समर्पित असतात तर १२ ज्योतिर्लिंगे स्वयंभू स्वरूपात प्रकट झाली आहेत त्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिर हे या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. धर्मराज युधिष्ठिराने आपल्या १४ वर्षांच्या वनवासात या मंदिराची स्थापना केली होती असे मानले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक भेट देतात.
२. मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर: हे मंदिर भगवान मल्लिनाथ यांना समर्पित असून, हिंगोलीपासून सुमारे ३५ किमी अंतरावर शिरड सहापूर या गावात आहे. हे सुमारे ३०० वर्षे जुने असून याची एक रोचक कथा आहे. पूर्वी हिंगोलीच्या अर्धापूर येथे मल्लिनाथांची मूर्ती होती. पण भट्टारक श्री प्रेमानंद यांना हि जागा योग्य नसल्याचे जाणवले. त्यांनी निजामकडे हि मूर्ती करंजा येथे स्थलांतरित करण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांना मिळाली देखील. मात्र करंजाला जात असताना शिरड सहापूर येथे त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यांनी मंदिर तिथेच उभारण्याचा निर्णय घेतला. आजही या ठिकाणी जैन भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
३. तुळजादेवी संस्थान: हे आणखी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. स्वामी केशवराज यांना देवी तुळजा भवानीची मूर्ती येथे सापडली आणि त्यांनी तिची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यानंतर या ठिकाणी एक मंदिर उभारले गेले जे १२५ वर्षांपासून उभे आहे. येथे दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने देवीची यात्रा भरते.
४. संत नामदेव संस्थान,नरसी: नरसी हे संत श्री नामदेव महाराजांचे जन्मस्थान आहे. १२७० साली जन्मलेल्या नामदेव महाराजांचे पूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर असे होते. येथे दरवर्षी त्यांच्या सन्मानार्थ मोठी यात्रा भरते. त्यांच्या कार्यामुळे हे गाव आणि संस्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
हिंगोलीला भेट द्यायची असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे. या महिन्यांत हवामान आल्हाददायक राहते, त्यामुळे फिरण्यासाठी आणि स्थळदर्शनासाठी योग्य वेळ ठरते. उष्णतेची फारशी चिंता न करता निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो आणि बाहेरच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागही होता येते.
जून ते सप्टेंबर या काळात पावसाळा हिरवाई घेऊन येतो आणि परिसर अतिशय नयनरम्य दिसतो. मात्र, सततच्या पावसामुळे तुमच्या प्रवासाच्या योजना बिघडण्याची शक्यता असते.
| महिना | वैशिष्ट्ये |
| ऑक्टोबर ते फेब्रुवारी | सुखद हवामान, पर्यटनासाठी उत्तम, बाह्य उपक्रमांचा आनंद घेता येतो |
| जून ते सप्टेंबर | पावसाळा, हिरवेगार निसर्गदृश्य, पण मुसळधार पाऊस प्रवासात अडथळा आणू शकतो |
हिंगोली जिल्ह्याला का भेट द्यावी?
हिंगोली महाराष्ट्रातील एक लपलेला खजिना आहे. इथे इतिहास, संस्कृती आणि मंदिरे यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ मंदिर आहे, तसेच मल्लिनाथ दिगंबर मंदिर हे जैन भाविकांसाठी महत्वाचे आहे.
तुळजादेवी संस्थान येथे देवी तुळजा भवानीचे शांत आणि भक्तिमय दर्शन घेऊ शकता या शिवाय नरसी गाव येथे संत नामदेव यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याचा खास अनुभव घेऊ शकता.
याशिवाय हिंगोलीची रंगतदार सण-उत्सवांची परंपरा, अप्रतिम पैठणी साड्या आणि प्राचीन वारली चित्रकला या गोष्टी तुमच्या प्रवासाला अधिक संस्मरणीय बनवतील. हिंगोलीचे असे वेगळेपण अनुभवायचे असल्यास, ही जागा तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्की असायलाच हवी!
प्रवासासाठी आवश्यक गोष्टी
प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.
हवामान
29 - 41°C
आदर्श कालावधी
१ दिवस
सर्वोत्तम वेळ
नोव्हेंबर ते फेब्रुवारी
प्रमुख आकर्षणे
आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

औंढा नागनाथ मंदिर
भगवान शिवाला समर्पित असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे प्राचीन मंदिर आपल्या धार्मिक महत्त्व आणि वास्तुकलेच्या सौंदर्यामुळे देशभरातील भाविकांना आकर्षित करते.

मल्लिनाथ दिगंबर जैन
औंढा नागनाथ तालुक्यातील शिराड शहापूर गावात जैन समाजाचे एक अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे.

संत नामदेव संस्थान
जिल्ह्यातील नरसी हे गाव संत श्री नामदेव यांचे जन्मस्थान आहे.

