बुलढाणा जिल्ह्याची ओळख
महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलढाणा जिल्हा! ह्या लहानशा जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या तुलनेत कधीकधी दुर्लक्षित केलं जातं. पण इतिहास,संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा असा काही मिलाफ इथे आहे की जो आपल्याला येथे लगेच जाणवतो. बुलढाणा भेट देण्यासाठी नुसतं एक ठिकाणच नाही, तर ती महाराष्ट्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या अद्भुत नगरीची सहल आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास
बुलढाणा या नावाचा उगम “भिल ठाणा” या शब्दांपासून झाला असावा असे मानले जाते. ज्याचा अर्थ भिल्ल या आदिवासीसमूहाचे घर असा होतो. पूर्वी बुलढाणा जिल्हा आणि बेरार प्रांत प्राचीन विदर्भ राज्याचा भाग होते ज्याचा उल्लेख महाभारतामध्ये सापडतो. या भूमीवर अनेक राजवटींनी राज्य केले जसे की मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव!
१४व्या शतकात अलाउद्दीन खिलजीने हा प्रदेश जिंकून मुसलमान राजवटीची सुरुवात केली. यानंतर हा भाग बहमनी राजवटीत समाविष्ट झाला. १५७२ मध्ये तो निजामशाहीचा भाग बनला. १५९५ साली मुघल साम्राज्याने बेरारचा ताबा घेतला. मुघल साम्राज्याचं सामर्थ्य कमी झाल्यावर, १७२४ साली हैदराबादच्या निजाम असफजाह पहिला याने हा भाग आपल्या अखत्यारीत घेतला.
१८५३ साली ब्रिटिशांनी बुलढाण्याचा ताबा घेतला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे प्रशासन सुरू केलं. १९०३ साली निजामाने हा भाग ब्रिटिशांना भाडेपट्टीवर दिला. १९५० साली बुलढाणा मध्य प्रदेशाचा भाग बनला आणि १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर हा जिल्हा महाराष्ट्रात समाविष्ट झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा अध्यात्म, नैसर्गिक सौंदर्य, आणि सांस्कृतिक वारशाचा संगम असलेल्या विविध पर्यटनस्थळांसाठी ओळखला जातो. येथे मंदिरे, वन्यजीव अभयारण्ये, मनोहारी निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना अनुभवता येतात. धार्मिक यात्रा, निसर्गाच्या सान्निध्यात रमणं, किंवा इतिहासाचा मागोवा घेणाऱ्यांसाठी बुलढाणा जिल्हा एक उत्तम डेस्टिनेशन ठरतो.
- धार्मिक स्थळे
१. आनंद सागर, शेगाव: शेगावमधील आनंद सागर हा मानवनिर्मित तलाव आणि संकुल आहे. श्री गजानन महाराज संस्थानने पाणीटंचाई सोडवण्यासाठी आणि लोकांसाठी अध्यात्म व आनंदी परिसर तयार करण्यासाठी याची निर्मिती केली. माण नदीतून पाणी पंप करून तलाव भरला जातो. येथे शांत अध्यात्मिक वातावरण आणि थीम पार्कसारखे आनंददायी अनुभव मिळतात. यामधून मिळालेली कमाई स्थानिक पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर खर्च केली जाते. येथे आकर्षक प्रवेशद्वार, सुंदर कारंजे आणि महाराष्ट्रातल्या संतांची ओळख करून देणारे एक संग्रहालय तुम्हाला पाहायला मिळते. शिवाय भगवान शंकर, गणेश व नवग्रहांची मंदिरेही येथे तुम्ही पाहू शकता. - निसर्गरम्य स्थळे
१. लोणार सरोवर: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे प्लायस्टोसीन युगात एका उल्कापातामुळे तयार झालेले अनोखे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे बेसाल्ट खडकांवर तयार झालेलं उच्च वेगाच्या उल्कापाताचं जगातील एकमेव विवर आहे. सरोवराचा व्यास सरासरी १.२ किमी आहे. सरोवराला खारट आणि अल्कधर्मी दोन्ही प्रकारच्या गुणधर्मांची जोड आहे. परिसरात गोड्या पाण्याचेही झरे आहेत. हे झरे धार, सीतनहिनी आणि रामगया नावाने ओळखले जातात. हे झरे आणि सरोवराजवळील मंदिरे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्षभर तुम्ही येथे भेट देऊ शकता पण उन्हाळ्यात अति उष्ण हवेमुळे मात्र इथे भेट देण्याचे टाळणे योग्य राहते.
२. गिरडा: बुलढाण्यापासून १६ किमी अंतरावर असलेले गिरडा, अजिंठा पर्वतरांगेतील सुंदर टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पांडवकालीन महादेव मंदिर आहे, ज्याचा संबंध अर्जुनाशी जोडला जातो. लोकांच्या मते, पांडवांच्या वनवासादरम्यान अर्जुनाने येथे पाच झरे निर्माण केले आणि त्यातील पाणी अजूनही गोमुखातून येत असल्याचे मानले जाते. धार्मिक महत्त्व आणि रमणीय निसर्गदृश्ये यामुळे गिरडा तुमच्या प्रवासामध्ये एक प्रमुख आकर्षण ठरू शकते.
३. ज्ञानगंगा अभयारण्य: बुलढाणा-खामगाव राज्यमार्गालगत असलेल्या २०५ चौ.किमी क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात बोथी गावाचा समावेश आहे. विविध वनस्पती आणि प्राण्यांचा अधिवास जतन करणारे हे अभयारण्य निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही इथे जंगल सफारी अनुभवू शकता.
४. अंबाबरवा अभयारण्य: संग्रामपूर तालुक्यातील १२७ चौ.किमी क्षेत्रफळ असलेले अंबाबरवा अभयारण्य सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे आणि मध्य प्रदेशाला लागून आहे. विविध वनस्पती व प्राण्यांसाठी ओळखले जाणारे हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य वन्यजीव पर्यटनस्थळ आहे. येथील हिरवळ आणि समृद्ध जैवविविधतेमुळे हे ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल.
बुलढाण्याला भेट देताना स्थानिक सण आणि महोत्सवांचा अनुभव घ्यायला विसरू नका. या मध्ये सहभागी होऊन तुम्ही या प्रदेशाची संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमचा बुलढाणा दौरा तुम्हाला महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचे नव्याने दर्शन घडवेल आणि एक अविस्मरणीय अनुभव देईल.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
बुलढाण्याचा प्रवास नियोजित करताना योग्य वेळ निवडणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही ऋतूत भेट दिली तरी बुलढाणा तुम्हाला अविस्मरणीय आठवणी देणारे अनेक अनुभव देईलच परंतु विशेषतः हिवाळा तुम्हाला आल्हाददायक वातावरणात फिरण्याची मजा देईल.
| हंगाम | महिने | तापमान श्रेणी | ठळक वैशिष्ट्ये |
| हिवाळा | ऑक्टोबर – फेब्रुवारी | १०°C – ३०°C | आऊटडोअर उपक्रमांसाठी आदर्श हवामान, फुलांनी भरलेलं निसर्गसौंदर्य, सण आणि पर्यटनस्थळांची भेट |
| पावसाळा | जून – सप्टेंबर | २०°C – ३५°C | हिरवीगार नैसर्गिक दृश्यं, भव्य धबधबे, फोटोग्राफीसाठी मनोहारी वातावरण |
| उन्हाळा | मार्च – मे | २५°C – ४५°C | कमी गर्दी असलेली पर्यटनस्थळं, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा भटकंतीसाठी उत्तम वेळ |
बुलढाणा जिल्ह्याला का भेट द्यावी?
बुलढाण्याला तुमच्या प्रवासाच्या यादीत सामावून घेण्याची कारणं खूप आहेत. या ठिकाणाचा असलेला समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा, अप्रतिम निसर्गदृश्यं आणि चविष्ट खाद्यपदार्थ यामुळे तुमच्या प्रवासाच्या पुढच्या यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्याला नक्की भेट द्या.
मंदिरांपासून ते वन्यजीव अभयारण्यांपर्यंत प्रत्येकासाठी अनुभवण्यासारखे आणि पाहण्यासारखे इथे काही ना काही आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मागे असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात प्रवास करताना तुम्हाला नक्की जाणवेल की इथे फक्त पाहण्याची ठिकाणंच नाहीत, तर महाराष्ट्राच्या गाभ्याशी तुम्हाला जोडणारा हा एक नवा अनुभव आहे!
प्रवासासाठी आवश्यक गोष्टी
प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.
प्रमुख आकर्षणे
आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

अंबाबारवा अभयारण्य
अंबाबरवा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अभयारण्यांपैकी हे एक अभयारण्य आहे. अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे स्थित असून ते सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. येथे वाघ, सिंह, चित्ते आणि इतर वन्यप्राणी पाहायला मिळतात.

राजूर घाट
बुलढाणा-मलकापूर मार्गावर वसलेला 'राजूर घाट' आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. केवळ या घाटाचा अनुभव घेण्यासाठी विविध राज्यांतून लोक येथे येतात. राजूर घाटात विविध मंदिरे, नद्या, तसेच विविध प्रकारची झाडे व झुडपे पाहायला मिळतात. येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. या भागातील आल्हाददायक व थंड हवामानही पर्यटकांना आकर्षित करणारे ठरते.

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य
बुलढाणा परिसरातील शहरांमध्ये पर्यटनासाठी अनेक नैसर्गिक आकर्षणे आणि अभयारण्ये आहेत. येथील सर्वात मोठ्या अभयारण्यांपैकी एक म्हणजे 'ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य', जिथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. दरवर्षी हजारो पर्यटक या अभयारण्याला भेट देतात. निसर्गप्रेमींसाठी बुलढाणा जिल्ह्यातील हे एक अत्यंत आवडते ठिकाण आहे.

गजानन महाराज मंदिर
बुलढाणा शहरात अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत; त्यापैकीच एक म्हणजे 'गजानन महाराज मंदिर', जे धार्मिक पर्यटकांचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. गजानन महाराजांवर श्रद्धा असलेले लोक—मग ते बुलढाणा परिसरातील असोत किंवा दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले पर्यटक असोत—या मंदिरात येतात.

आनंद सागर
शेगाव परिसरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून, श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांनी पाण्याने भरलेले एक सरोवर निर्माण करण्याचा प्रकल्प राबवला. 'आनंद सागर' हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे स्थित एक पर्यावरण-पर्यटन स्थळ आहे. शेगाव हे गाव आनंद सागरपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे.

लोणार सरोवर
लोणार सरोवराविषयी माहिती: माध्यमिक शाळांमध्येही लोणार सरोवराबद्दल शिकवले जाते. हे सरोवर प्रत्यक्ष पाहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याला नक्की भेट द्या. बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे एक खारे पाण्याचे सरोवर मानले जाते. हे सरोवर एका उल्कापातामुळे निर्माण झाले असून, दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

भगवान हनुमान
बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

रेणुका देवी मंदिर
बुलढाणा जिल्ह्यात धार्मिक पर्यटनासोबतच नैसर्गिक पर्यटनाचीही संधी आहे. हे जिल्हा धार्मिक पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र असून, येथील रेणुका देवीचे मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे रेणुका देवीचे मंदिर स्थित आहे; हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे जिथे रेणुका देवीचे भक्त दर्शनासाठी जमतात.

सैलाणी बाबा दर्गा
बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

सिंदखेड राजा
राजमाता जिजाऊ, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. इतिहासप्रेमींनी आवर्जून भेट द्यावे असे हे एक ठिकाण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हे एक आहे. 'भुईकोट वाडा' हेच ते ठिकाण आहे जिथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता.

