भंडारा जिल्ह्याची ओळख
महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला भंडारा जिल्हा अनेकदा पर्यटकांच्या नजरेतून सुटतो. जिथे अनेकजण प्रसिद्ध ठिकाणांकडे धाव घेतात, तिथे हा लपलेला खजिना खऱ्या अर्थाने संस्कृती, इतिहास आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असा आहे. भंडारा म्हणजे केवळ नकाशावरचे एक ठिकाण नसून महाराष्ट्राच्या खऱ्या गाभ्याचा परिचय करून देणारे शहर आहे.
भंडाऱ्याला “महाराष्ट्राचे तांदळाचे कोठार” असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणावर तांदूळ पिकवला जातो. या भागाची सुपीक माती, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि सिंचन व्यवस्था यामुळे भंडाऱ्यातील शेती समृद्ध आहे. येथील शेतकरी जुन्या व पारंपरिक पद्धतीने तांदूळ पिकवतात, जे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतात.भंडारा शहराला “सिटी ऑफ ब्रास” म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणावर पितळी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या औद्योगिक संस्था आहेत.
भंडारा शहरात पोहोचल्यावर, तुम्हाला येथील लोकांची आपुलकी जाणवेल आणि मनोहर दृश्यांची झलकही दिसेल. हिरवीगार शेती आणि शांत, नयनरम्य दृष्यांनी वेढलेले हे शहर फक्त एक क्षणभराचा थांबा नाही, तर शांतता आणि इतिहासाचा सुरेख मेळ दाखवणारे ठिकाण आहे.
भंडारा जिल्ह्याचा समृद्ध इतिहास
भंडारा जिल्ह्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे, जो इथल्या विविध लॊकसमूहांच्या परंपरा आणि संस्कृतींशी जोडलेला आहे. भंडारा जिल्हा अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. या जिल्हयानी गोंडवाना राजे, मराठे यांसारख्या अनेक सत्ताधीशांच्या प्रभावाचा अनुभव घेतलेला आहे. या प्राचीन वारशाचा ठसा भंडाऱ्यातील वास्तूंमध्ये तसेच येथील स्थानिक जीवनशैलीत आणि उत्सवांमध्ये जाणवतो.
भंडारा जिल्ह्याचा इतिहास सातव्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा तो छत्तीसगडच्या यादव राजांच्या महाकोसल साम्राज्याचा भाग होता. या जिल्ह्याचे नाव “भन्नारा” या नावावरून पडले असून, याचा उल्लेख ११व्या शतकातील रतनपूर येथील शिलालेखात आढळतो. पौराणिक कथांनुसार, भंडारा हा भंडकदेश म्हणूनही ओळखला जातो आणि असे मानले जाते की या प्रदेशातील एका राजाने गंगा नदीला येथे आणून तिला वैणगंगा असे नाव दिले.
बाराव्या शतकात राजपूतांनी भंडारा ताब्यात घेतला आणि त्यानंतर येथे गोंड राजवंशाची सत्ता आली. सतराव्या शतकात पेशव्यांनी हा प्रदेश जिंकून तो बेरारमध्ये समाविष्ट केला. १६९९ मध्ये परसोजी भोसले यांनी विदर्भ आणि बेरारसह भंडाऱ्यावर आपले अधिपत्य मिळवले. १७४३ मध्ये रघोजी भोसले हे विदर्भाचे शासक झाले आणि १७५५ मध्ये त्यांचे पुत्र जनोजी भोसले यांनी सत्ता सांभाळली. १८१८ ते १८३० या काळात लांजीच्या जहागीरदारांनी हा प्रदेश प्रशासित केला आणि १८२१ मध्ये भंडारा जिल्ह्याची स्थापना करण्यात आली.
१८५०च्या दशकात निजामांनी पेशव्यांना पराभूत करून बेरार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सुपूर्त केला. १९०३ मध्ये हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या वेळी भंडारा मध्य प्रदेशातून मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर भंडारा हा त्यातील एक जिल्हा बनला. १ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, आणि यामुळेच गोंदिया आणि भंडारा हे दोन स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात आले.
भंडाऱ्याचा इतिहास संग्रहालयांपुरता मर्यादीत नसून तो येथील लोकांच्या पारंपारिक जीवनशैलीचं जिवंत उदाहरण आहे. येथील उत्साही जनसंपदा संस्कृती आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा जपून आहेत त्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्याला भेट देणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरतो.
भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
- धार्मिक स्थळे
भंडारा जिल्हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा एकत्र आणतो, ज्याला सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. प्राचीन बौद्ध परंपरांपासून मंदिरांपर्यंत हा जिल्हा इतिहासप्रेमी आणि श्रद्धाळू लोकांसाठी बरंच काही देत आलेला आहे.
१. महासमाधी भूमी:
महासमाधी भूमी ही बौद्ध धर्माच्या इतिहासाशी जोडलेली एक महत्त्वाची जागा आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वी बौद्ध धर्म या भागात भरभराटीला आला परंतु १७०० च्या दशकापर्यंत तो भारतातून लोप पावला. महासमाधी भूमी हा बौद्ध धर्माचा उदय आणि पतन याचा साक्षीदार आहे. बौद्ध धर्माच्या भारतातील प्रवासाचे व आध्यात्मिक विचारांचे मुळ समजून घेण्यासाठी ही जागा अनमोल ठेवा आहे.
२. कोरंभी मंदिर:
भंडारा जिल्ह्यातील कोरंभी गावात वसलेले कोरंभी मंदिर एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील देवतेबद्दल व स्थापत्याबद्दल ठोस माहिती नसली तरीही मंदिराचे पवित्र वातावरण आणि सांस्कृतिक वारसा यामुळे भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. - निसर्गरम्य स्थळे
१. रावणवाडी धरण:
“रावणवाडी धरण सिंचन प्रकल्प” हा परिसराला पाणी पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हिरव्यागार परिसरात वसलेले हे धरण शांतता अनुभवण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. धरणाच्या सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते.
२. गोसेखुर्द धरण (इंदिरासागर धरण):
इंदिरासागर धरण भंडारा जिल्ह्यातील सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानिक लोक याला गोसेखुर्द प्रकल्प म्हणतात. हे धरण अनेक गावांना पाणीपुरवठा करते आणि शेतकऱ्यांना शेतीतून उपजीविका चालवण्यासाठी मदत करते. धरणाचा भव्य आकार आणि मनमोहक परिसर हे ठिकाण पर्यटकांसाठी खास बनवतो. इथे तुमच्यासाठी फोटोग्राफीला साजेशी अशी पार्श्वभूमी आहे. हे धरण फक्त पाणी पुरवठ्यासाठी उपयोगी नसून जिल्ह्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिक आहे.
या जिल्ह्याचा नैसर्गिक वारसा जपणारी दोन महत्वाची वन्यजीव अभयारण्ये इथे आहेत.
१. उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य: भंडारा शहरापासून सुमारे ६० किलोमीटर आणि नागपूरपासून ५८ किलोमीटर अंतरावर असलेले हे अभयारण्य भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात आहे. ज्यात बिबट्या, वाघ यांपासून अनेक प्राणी आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. उमरेड कऱ्हांडला हा वन्यजीव प्रेमी आणि छायाचित्रकारांना कायमच आकर्षित करतो. २. कोका वन्यजीव अभयारण्य: कोका वन्यजीव अभयारण्याला २०१३ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे भंडारा जिल्ह्याला एक नवीन अभयारण्य मिळाले. भंडारा शहरापासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असलेले हे अभयारण्य अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे. शहराच्या इतक्या जवळ असल्यामुळे निसर्ग प्रेमींना येथील वन्यजीवांचा जवळून आणि सहज आनंद घेता येतो.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
| हंगाम | महिने | तापमान श्रेणी | खास वैशिष्ट्ये | टीप्स |
| हिवाळा | ऑक्टोबर – फेब्रुवारी | १०°C – ३०°C | १. आऊटडोअर ऍक्टिव्हिटी साठी आदर्श हवामान २.रान फुलांचा उत्सव आणि इतर प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची उत्तम संधी | गरम कपडे सोबत ठेवा. |
| पावसाळा | जून – सप्टेंबर | २०°C – ३५°C | १. हिरवागार परिसर, सुंदर धबधबे २. छायाचित्रणासाठी नयनरम्य वातावरण | मुसळधार पावसाच्या तयारीने जा. |
| उन्हाळा | मार्च – मे | २५°C – ४५°C | १. कमी गर्दी असलेली पर्यटन स्थळे २.सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिराच्या भ्रमंतीसाठी योग्य | दुपारचे कडक ऊन्ह टाळावे. |
भंडारा जिल्ह्याला का भेट द्यावी?
भंडारा जिल्हा पर्यटनासाठी अल्पपरिचित असे रत्न आहे त्यामुळे फार कमी लोकांना या ठिकाणाबद्दल माहिती आहे. त्याचा समृद्ध इतिहास, सुंदर निसर्ग, जीवंत संस्कृती आणि चविष्ट जेवण हे या जिल्ह्याला खास बनवतात. जेव्हा तुम्ही भंडाऱ्याला भेट द्याल तेव्हा इथल्या लोकांमध्ये, अभयारण्यांमध्ये आणि परंपरांत रमून जाल.
इथे दररोज काहीतरी नवीन पाहिल्याचे समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल, त्यामुळेच भंडारा “तुमच्या प्रवासाच्या यादीत’ असायलाच हवा.
प्रवासासाठी आवश्यक गोष्टी
प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.
प्रमुख आकर्षणे
आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

अंबागड किल्ला
एक ऐतिहासिक किल्ला, जिथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते आणि या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाची झलक पाहायला मिळते.

गोसीखुर्द धरण
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी एक असलेला हा प्रकल्प नयनरम्य दृश्ये प्रदान करतो आणि जलक्रीडा व पाण्याशी संबंधित उपक्रमांसाठी एक प्रमुख ठिकाण आहे.

कोका वन्यजीव अभयारण्य
वन्यजीव प्रेमींसाठी नंदनवन असलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारची वनसंपदा आणि प्राणी-पक्षी आढळतात; तसेच हे ठिकाण पक्षीनिरीक्षण आणि निसर्ग-भ्रमंतीसाठी अत्यंत उत्तम आहे.

रावणवाडी धरण
स्थानिकांमध्ये सहलीसाठी लोकप्रिय असलेले हे धरण शांत वातावरण आणि सुंदर निसर्गदृश्ये प्रदान करते.

नागझिरा वन्यजीव अभयारण्य
भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे ठिकाण वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, वाघांचे दर्शन आणि सफारी सफरींसाठी पर्यटकांना आकर्षित करते.

उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्य
नागपूरपासून सुमारे ५८ किमी आणि भंडारापासून ६० किमी अंतरावर असलेले उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुका आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. हे अभयारण्य वैनगंगा नदीच्या काठावरील वनक्षेत्राद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी देखील जोडलेले आहे.

