पुणे जिल्ह्याची ओळख

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा इतिहास,संस्कृती आणि आधुनिक प्रगतीचा अनोखा संगम आहे. “पूर्वेचे ऑक्सफर्ड” म्हणून ओळखले जाणारे पुणे शैक्षणिक संस्था, आयटी हब्स आणि गतिशील जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या आधुनिकतेसह पुणे जिल्हा ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेमुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतो.

पुणे जिल्हा दक्खन पठारावर वसलेला असून तो पुणे विभागाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या जिल्ह्याला सातारा, अहमदनगर, सोलापूर आणि रायगड या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक,औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून पुणे जिल्ह्याला वेगळी ओळख आहे. आल्हाददायक हवामान, समृद्ध परंपरा आणि आधुनिक शहरसंस्कृती यामुळे पुणे पर्यटकांसाठी आणि रहिवाशांसाठी एक अत्यंत आकर्षक ठिकाण ठरते.

पुण्याचा इतिहास

पुणे हे इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध असे शहर आहे. १६०० च्या सुरुवातीला निजामशाहीतील अहमदनगरच्या शासकांनी मराठा सरदार मालोजीराजे भोसले यांना पुण्याची जहागिरी बहाल केली. मालोजींचे पुत्र, शहाजी राजे, दक्षिण भारतात सैनिकी मोहिमा राबवण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी स्वतःच्या पत्नी जिजाबाई आणि लहान मुलगा शिवाजीसाठी पुण्यात निवासाची व्यवस्था केली. हाच बाल शिवाजी पुढे जाऊन मराठा साम्राज्याचा संस्थापक झाला. शिवरायांच्या बालपणी पुण्याच्या सत्तेमध्ये अनेक बदल होत गेले. यात भोसले घराणे, आदिलशाही आणि मुघल या सत्तांचा समावेश होता.

१७०० च्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांनी, पहिल्या पेशव्यांच्या रूपात बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांची नियुक्ती केली. त्यानंतर बाजीराव पेशवे प्रथम यांच्या काळात पुण्याचा विस्तार व सौंदर्यवर्धन झाले तसेच राजकीय महत्त्वही प्रचंड वाढले.
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात पुणे मराठ्यांचे सामरिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून बहरले. मात्र १८१८ मध्ये इंग्रजांनी तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात विजय मिळवून पेशवाईचा अस्त केला आणि पुण्यावर ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली.

१८५८ मध्ये भारतावर थेट ब्रिटिश प्रशासन स्थापन झाले आणि पुणे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनले. यामुळे पुण्यात नवीन प्रशासकीय आणि सांस्कृतिक प्रभाव पडू लागला. पुण्यात ठिकठिकाणी ब्रिटिश सैनिकी तळ आणि शिक्षण संस्था विकसित झाल्या. या काळात पुणे हे सामाजिक सुधारणांचे केंद्र बनले; महात्मा जोतिराव फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक सुधारणांचा पाया रचला. यामध्ये ताराबाई शिंदेंसारख्या कार्यकर्त्यांनी स्त्रीसक्षमीकरणामध्ये मोठे योगदान दिले.

१८९२ मध्ये लोकमान्य टिळक यांनी खासगी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन राष्ट्रभावना जागृत केली. यामुळे पुण्यात राष्ट्रीय आंदोलनाची ठिणगी पेटली आणि लोक सहभाग वाढला. पुणे स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षाचे कायम साक्षीदार राहिले. महात्मा गांधी येरवडा कारागृहात अनेकदा अटकेत होते. १९३२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये झालेला “पूना करार” येथेच झाला होता.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, पुणे हे कायम शिक्षण,माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर राहिले. तसेच उत्कृष्ट शिक्षणासाठी भारतभर ओळखले जाणारे पुणे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारे महत्त्वाचे शहर बनले.

पुण्याचा इतिहास मराठ्यांच्या पराक्रमापासून, ब्रिटिश राजवटीपर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरच्या विकासापर्यंत बदलत गेला. आजही पुणे परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे!

पुण्यातील सांस्कृतिक विविधता

पुणे संस्कृती आणि परंपरांचा सुंदर संगम असलेले शहर आहे. येथे विविध प्रांत, धर्म आणि समुदायातील लोक एकत्र राहतात त्यामुळे एक वैविध्यपूर्ण आणि बहुसांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळते. पुण्यात गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी, ईद आणि ख्रिसमस यांसारखे सर्व सण मोठ्या जल्लोषात आणि ऐक्याने साजरे केले जातात.

पुणे हे संगीत, नाटक आणि पारंपरिक नृत्यकलेसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी शास्त्रीय संगीत महोत्सव, नाट्यस्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात, त्यामुळे कला आणि कलाकारांचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख कायम आहे. पारंपरिक वारसा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ जपणारे हे शहर सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे!

पुण्याचे खास खाद्यसंस्कृती

पुण्यातील खाद्यसंस्कृती ही पारंपरिक मराठी चवींचा आणि आधुनिक पदार्थांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. काही आवर्जून चाखण्यासारखे पदार्थ, जसे की:

१. मिसळ पाव: झणझणीत रस्सा, त्यावर कुरकुरीत फरसाण आणि सोबत पाव. हे पुणेकरांचे लाडके खाद्य!

२. बाकरवडी: खमंग आणि तिखट-गोड चव असलेले कुरकुरीत स्नॅक! बाकरवडी एकदा खाल्ली की पुन्हा खाण्याचा मोह आवरत नाही!

३. पुरणपोळी: गूळ आणि चण्याच्या डाळीच्या गोडसर सारणाने भरलेली पोळी, खासकरून सणांमध्ये बनवली जाते.

४. वडा पाव: भारतीय बर्गर म्हणून प्रसिद्ध असलेला हा झटपट आणि चविष्ट नाश्ता, पुणेकरांचा आवडता!

५. मस्तानी: घट्ट, गोडसर मिल्कशेक, त्यावर सुकामेवा आणि आइस्क्रीम ही खास पुण्याची ओळख!

पुण्यात फिरायला आलात तर या पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या आणि पुण्याच्या चविष्ट प्रवासाचा आनंद लुटा!

पुणे – शिक्षण आणि IT क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र

शिक्षणाच्या उत्तम संधी आणि अनेक प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असल्याने, पुणे “पूर्वेचे ऑक्सफर्ड” म्हणून ओळखले जाते. शिक्षणाच्या उत्तम संधी आणि सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमुळे पुणे देशातील एक प्रमुख शिक्षण केंद्र बनले आहे.

पुणे केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नाही तर ते IT आणि उद्योग जगताचे मोठे केंद्र आहे. येथे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्टार्टअप्स स्थायिक झाल्या आहेत ज्यामुळे पुणे तंत्रज्ञान आणि उद्योग व्यवसायासाठी एक आकर्षक शहर बनले आहे. शिक्षण, संशोधन आणि आधुनिक उद्योगांच्या संधी मिळवण्यासाठी पुणे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतातील सर्वोत्तम ठिकाण आहे!

पुण्यातील प्रमुख पर्यटक आकर्षण

  • धार्मिक स्थळे
    १. कसबा गणपती: कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत म्हणजेच गावाचे मुख्य दैवत आहे. लाल महालाजवळ कसबा पेठेत स्थित असलेला हा गणपती पुण्यातील पहिला मानाचा गणपती मानला जातो. गणेश उत्सवाच्या मिरवणुकीला पहिल्या गणपतीचा विशेष मान कसबा गणपतीला दिला जातो. या गणेशाची मूर्ती छ. शिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांनी प्रतिष्ठापित केली होती असेही मानले जाते.
    २. सारसबाग: सारसबाग एक सुंदर पेशवेकालीन बाग आहे. जिथे घनदाट हिरवळ आणि जॉगिंग ट्रॅक आहेत. या बागेतील एक आकर्षक ठिकाण म्हणजे एक लहानसे तळे! या मध्ये प्रसिद्ध असलेले गणेश मंदिर आहे. याला ‘तळ्यातला गणपती’ असेही म्हणतात.
    ३. पर्वती: या टेकडीवर असलेले शांत वातावरण आणि प्राचीन मंदिरे अजूनही टिकून आहेत. शहराचा सुंदर नजारा पाहण्यासाठी पुणेकर आणि पर्यटकांची ही आवडती जागा आहे.
  • ऐतिहासिक स्थळे
    १. शनिवार वाडा: पेशव्यांनी बांधलेला शनिवार वाडा पुण्याच्या इतिहास आणि स्थापत्यकलेचे प्रतीक आहे.
    २. आगा खान महल: या ऐतिहासिक महालाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि आजही येथे महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एक संग्रहालय आहे.
  • किल्ले
    १. सिंहगड किल्ला: हे एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन असून इथे गेल्यावर चुलीवरची गरम गरम पिठलं-भाकरी खाण्याचा आस्वाद नक्की घ्यायला हवा. इथून निसर्गाच्या सुंदर छटा आणि मराठा इतिहासाची झलक दिसते.
    २. शिवनेरी किल्ला: हा किल्ला १७ व्या शतकातील एक सैनिकी किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ म्हणून ऐतिहासिक महत्त्व राखतो. किल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘बदामी तलाव’ नावाचा एक जलाशय आहे. शिवनेरी किल्ल्याला गंगा आणि यमुना या दोन नावांचे दोन जिवंत झरे देखील आहेत. जे किल्ल्याला वर्षभर पाणी पुरवतात.
  • अन्य आकर्षणे
    १. राजा दीनकर केळकर संग्रहालय: या संग्रहालयात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याच्या विविध वस्तूंचा संग्रह आहे.
    २. खडकवसला धरण: मुठा नदीवर स्थित खडकवसला धरण पुण्याला पाणी पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. धरणाजवळच राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) आहेत. थोड्या अंतरावर सिंहगड किल्ला आणि पानशेत व वरसगाव धरण देखील आहेत.जे मुख्यतः सिंचनासाठी आवश्यक पाणी पुरवतात.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

ऋतूसर्वोत्तम महिनेहवामानसर्वोत्तम वेळ भेटीचाविशेष कार्यक्रम
पाऊस आणि हिवाळाजुलै ते फेब्रुवारीथंड आणि आरामदायकदर्शनासाठी, निसर्गप्रेमींना, आणि आऊट डोअर ऍक्टिव्हिटीसाठी आदर्शसवाई गंधर्व संगीत महोत्सव (डिसेंबर)
उन्हाळामार्च ते जूनउष्ण आणि प्रचंड गरमउष्णतेमुळे भेट देण्यास अयोग्य काळआंबा महोत्सव आणि वॉटरपार्क्स

पुणे जिल्ह्याला का भेट द्यावी?

पुणे परंपरा आणि आधुनिकतेच्या उत्तम समतोलाने सजलेले शहर आहे. येथे चांगल्या पायाभूत सुविधा जसे की शॉपिंग मॉल्स, आधुनिक घरे, उत्तम शिक्षण आणि आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध आहेत. पुणे त्याच्या जीवंत नाईट लाइफसाठी, गजबजलेल्या बाजारपेठांमुळे आणि समृद्ध कला क्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे.

पुणे हे इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिक जीवनशैलीचे एक विलक्षण मिश्रण आहे. जर तुम्हाला प्राचीन किल्ल्यांना भेट द्यायची असेल वा निसर्गासौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल किंवा विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर पुण्यात प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे काही ना काही खास सापडेलच!! त्यामुळे पुण्याला तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्कीच समाविष्ट करा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या!

प्रवासासाठी आवश्यक गोष्टी

प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.

हवामान

24 - 38°C

आदर्श कालावधी

१ - ३ दिवस

सर्वोत्तम वेळ

जुलै ते मार्च

प्रमुख आकर्षणे

आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

शनिवारवाडा

शनिवारवाडा हे महाराष्ट्रातील पुण्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. पुण्यातील पाहण्यासारख्या प्रमुख ठिकाणांपैकी हे एक आहे. हे मराठा साम्राज्यातील पेशव्यांचे मुख्य निवासस्थान व प्रशासकीय केंद्र होते. शनिवारवाडा १८ व्या शतकात बांधला गेला होता आणि १८२८ मध्ये लागलेल्या आगीत तो नष्ट झाला. तरीही, आजही तो पुण्यातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आणि पर्यटकांचे लोकप्रिय आकर्षण आहे.

दर्शन संग्रहालय

'दर्शन संग्रहालय' (Darshan Museum) हे महाराष्ट्रातील पुण्यात स्थित एक अद्वितीय संग्रहालय आहे. हे संग्रहालय आध्यात्मिक नेते आणि विचारवंत साधू वासवानी यांच्या जीवनकार्याला आणि शिकवणीला समर्पित आहे. जर तुम्हाला साधू वासवानींबद्दल आदर किंवा ओढ असेल, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. येथे साधू वासवानींची प्रेम, करुणा आणि विश्वबंधुत्वाची शिकवण विविध प्रदर्शने, तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमांतून मांडण्यात आली आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १९व्या शतकाच्या उत्तरार्धात दगडूशेठ हलवाई यांनी बांधले, म्हणूनच याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असे नाव देण्यात आले आहे. ते एक श्रीमंत मिठाई व्यापारी आणि गणपतीचे भक्त होते. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात भगवान गणपतीची एक भव्य मूर्ती आहे, जी मौल्यवान दागिने आणि फुलांनी सजवलेली आहे.

सिंहगड किल्ला

सिंहगड हा मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव 'कोंढाणा' असे आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १,३०० मीटर उंचीवर असलेल्या एका खडकाळ टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला इतिहासाचा साक्षीदार आहे; शतकानुशतके या किल्ल्याने अनेक लढाया आणि सत्तांतरे पाहिली आहेत.

इस्कॉन एनव्हीसीसी मंदिर

पुण्यातील 'इस्कॉन एनव्हीसीसी' (ISKCON NVCC) मंदिर ही 'इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस' (इस्कॉन) - जी 'हरे कृष्ण चळवळ' म्हणूनही ओळखली जाते - यांची एक शाखा आहे. इस्कॉन मंदिराचे वातावरण कसे असते, हे सर्वांनाच माहित आहे; त्याचप्रमाणे, येथील अंतर्गत वातावरणही पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. दररोज संध्याकाळी, भक्त आणि अभ्यागत विविध पूजाविधी व भजनांमध्ये सहभागी होतात.

राजा दिनकर केळकर संग्रहालय

'राजा दिनकर केळकर संग्रहालय' हे विविध कलावस्तूंचे संग्रहालय आहे. यात प्रख्यात कला-संग्राहक आणि अभ्यासक डॉ. दिनकर ग. केळकर यांच्या संग्रहातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते. या संग्रहालयात २०,००० हून अधिक कलावस्तू असून, त्या दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. या संग्रहालयाची स्थापना १९६२ मध्ये झाली. येथे भेट देणाऱ्यांना अत्यंत नक्षीदार शिल्पे आणि प्राचीन हस्तलिखितांसह विविध प्रकारच्या कलाकृती पाहता येतात.

आगा खान पॅलेस

आगा खान पॅलेस हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. इस्माईली मुस्लिम समुदायाचे आध्यात्मिक नेते सुलतान मुहम्मद शाह आगा खान (तिसरे) यांनी १८९२ मध्ये हे वास्तू उभारली होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या वास्तूचे विशेष महत्त्व आहे. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनादरम्यान महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी याच वास्तूत वास्तव्यास होते. कस्तुरबा गांधी आणि गांधीजींचे सचिव महादेव देसाई यांचे निधनही याच ठिकाणी झाले.

पुणे-ओकायामा मैत्री उद्यान

पुणे-ओकायामा फ्रेंडशिप गार्डन हे जपानी शैलीतील एक सुंदर उद्यान आहे. याला 'पु. ल. देशपांडे उद्यान' म्हणूनही ओळखले जाते. याची निर्मिती १९९६ मध्ये करण्यात आली. जपानी शैलीतील हे उद्यान पुणे आणि जपानमधील त्याचे 'सिस्टर सिटी' (भगिनी शहर) असलेल्या ओकायामा यांच्यातील मैत्रीच्या दृढ बंधाचे प्रतीक आहे. हे सुंदर उद्यान पारंपरिक जपानी 'त्सुकियामा' (Tsukiyama) शैलीवर आधारित असून, यात सुबकपणे साकारलेली बागकाम रचना, शांत जलाशय आणि निसर्गरम्य पायी चालण्याचे मार्ग यांचा समावेश आहे.

पाताळेश्वर मंदिर

हे मंदिर राष्ट्रकूट काळात एका गुहेमध्ये बांधले गेले होते. यात भारतीय शैलीतील चित्रे आणि शिलालेख आहेत, जे या मंदिराचे वैशिष्ट्य ठरतात. हे शिलालेख प्राचीन भारतीय पौराणिक कथांशी संबंधित आहेत. या मंदिराच्या आसपास काही वैशिष्ट्यपूर्ण उद्याने आणि मंदिरे आहेत. हे मंदिर एक आगळेवेगळे आणि शहरातील अत्यंत प्रमुख पर्यटन स्थळ मानले जाते.

बाशन सरोवर

हे पेशवे काळात बांधले गेले असून, शहराचे सर्वोत्तम दृश्य दिसणे हे याचे वैशिष्ट्य आहे. 'भाषण तलाव' (Bashan Lake) काळ्या पाषाणापासून बनलेला आहे. हा तलाव शहराच्या आग्नेय दिशेला स्थित असून, तो परिसर शेते, झाडे आणि लहान-लहान वैशिष्ट्यपूर्ण घरांनी नटलेला आहे; त्यामुळे येथे अतिशय सुंदर छायाचित्रे काढण्याची संधी मिळते. स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्यात या टेकडीची लोकप्रियता असण्यामागील एक कारण म्हणजे येथील 'पार्वती मंदिर'.

भिगवण पक्षी अभयारण्य

'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाणारे भिगवण पक्षी अभयारण्य हे पक्षिनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या जलाशयाच्या (बॅकवॉटर) परिसरात वसलेल्या या ठिकाणी, विशेषतः हिवाळ्याच्या काळात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येतात.

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असल्याने या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १३ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अत्यंत प्रभावी आहे आणि येथून परिसरातील निसर्गसौंदर्याचे विहंगम दृश्य दिसते.

मोराची चिंचोली

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 'मोराची चिंचोली' हे ठिकाण तेथील मोरांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. हे पर्यावरण-पर्यटन स्थळ ग्रामीण जीवन, पारंपरिक महाराष्ट्रीयन संस्कृती आणि नैसर्गिक अधिवासातील मोरांचे सौंदर्य अनुभवण्याची संधी देते.

कसे पोहोचाल

विमानाने

पुणे हे उत्तमरीत्या देखभाल केलेल्या रस्त्यांच्या जाळ्याद्वारे शेजारील शहरे आणि नगरांशी उत्तमरीत्या जोडलेले आहे. मुंबई (१४० किमी), अहमदनगर (१२१ किमी), औरंगाबाद (२१५ किमी) आणि विजापूर (२७५ किमी) ही शहरे विविध राज्य परिवहन आणि इतर बसेसद्वारे पुण्याशी चांगल्या प्रकारे जोडलेली आहेत. मुंबईहून स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या प्रवाशांनी ‘मुंबई-पुणे एक्सप्रेसवे’चा मार्ग निवडणे सोयीचे ठरते; या मार्गावरून सुमारे १५० किमीचे अंतर कापण्यास केवळ २ ते ३ तास ​​लागतात.

रेल्वेने

पुणे जंक्शन रेल्वे स्थानक शहराला भारतातील सर्व प्रमुख ठिकाणांशी जोडते. दक्षिण, उत्तर आणि पश्चिम भारतातील विविध ठिकाणांशी शहराला जोडणाऱ्या अनेक मेल/एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्या येथे उपलब्ध आहेत. मुंबई ते पुणे (आणि परतीच्या प्रवासासाठी) धावणाऱ्या काही प्रमुख गाड्यांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ आणि ‘शताब्दी एक्सप्रेस’ यांचा समावेश आहे; या गाड्यांना पुण्यात पोहोचण्यासाठी साधारणपणे साडेतीन तास लागतात.

रस्त्याने

पुणे शहर देशांतर्गत विमानसेवांद्वारे संपूर्ण देशाशी उत्तमरीत्या जोडलेले आहे. लोहगाव येथील विमानतळाला अलीकडेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला असून, तेथून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे कामकाज चालते. लोहगाव विमानतळ (किंवा पुणे विमानतळ) हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून १५ किमी अंतरावर स्थित आहे. प्रवाशांना आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी विमानतळाबाहेरून टॅक्सी आणि स्थानिक बस सेवा उपलब्ध आहेत.
Scroll to Top